Tuesday, July 15, 2014

कोमल रिषभ...तीव्र मध्यम 
===================

कमला तशी तिच्या आईबाबांजवळ खेड्यात फारशी राहिली नव्हती. दहा वय झालं आणि शिक्षणासाठी पुणे-मुंबई अन नंतर अमेरिका.त्यामुळे गावाच्या स्मृती तेवढ्याच. पण पाटी कोरी असते ना तेव्हा...अजून उमटलेलं पुसलं नव्हतं गेलेलं..

धनिक जमीनदाराची ती लाडकी एकुलती एक कन्या... 

बालपणीच्या वास्तव्यातल्या दोन व्यक्ती तिच्या मनात कायम घर करून राहिल्या..
एक पंडित शिवराज व्यास...गायन मास्तर 
आणि 
दुसरे बाबूमामा ...जे दिवसभर कमलाच्या घरीच असायचे..तिला गाणी म्हणून दाखवायचे..गोड गोष्टी सांगायचे...

व्यासांनी सांगितलेल्या काही गोष्टी संगीताशी निगडित होत्याही आणि नव्हत्याही...तिला ते चिमणी म्हणायचे..."हं दाखव गाऊन" ऐवजी "कर बघू आता तुझी चिव चिव" म्हणायचे..

"चिमणे...यमन रागाचं काय वैशिष्ठ्य?"

"गुरुजी..त्यात दोन्ही मध्यम येतात..एका साधा अन दुसरा तीव्र..."

नाही..आरोहातला "म" अवरोहात तीव्र होतो"..गुरुजी..

मग म्हणायचे 

"पोरी इतरत्र जसे तसेच संगीतातही तीव्र स्वर असतो बरं."

आज वयाच्या बाविसाव्या वर्षी कमला खेड्यात परतली होती..१-२ महिने रहाणार होती..१६ वर्षांनी इतके रहायला मिळणार होते.

पहिल्या आठवड्यात ती व्यास गुरुजी आणि बाबूमामा..दोघांनाही लगेच भेटून आली..दोघेही १६ वर्षांचा भार शिरावर घेऊन जरा वाकल्येत हे दिसले तिला.

गुरुजींनी ती पुढे गाण्यात काय काय शिकली हे जाणून घेतले आणि बाबूमामा तिच्या माथ्यावरून हात फिरवीत आशीर्वाद देत तिला म्हणाले होते..

"बबडे , अजून गोष्टी सांगू का? निजतांना गाणे म्हणू का"

दहाएक दिवस उलटले असतील..एकदा वाड्यात बाबांनी चार दोन लोकांना शेतीबद्दल काही सांगायला बोलावले होते. कमला बाजूच्या खोलीत वाचत बसली होती..

मिटिंग झाली..सारे गेले आणि एकटे बाबूमामा आणि बाबा राहिले..

"बाबुराव..केव्हा अक्कल येणार तुम्हाला?" बाबा असे रागावलेले तिने कधीच पाहिले नव्हे..ती हळूच भिंतीपाशी जाऊन ऐकू लागली.

"नांगरणी व्हायलाच हवी..कारण पुढे करू नका..आधीच गेला आठवडा वाया घालवलात..."

"धनी, बैलाचा पाय दुखावलाय..पण लावीन त्याला नांगराला..फक्त अजून चार दिवस द्या.. होईल पाय तेवढ्यापुरता बरा..." बाबूमामा

"बाबूराव अखेरचे सांगतो..उद्या नांगरणी सुरू झाली नाही तर ह्या घरात पुन: तुम्ही यायचे नाही. आत्तापर्यंत तुमच्या पुष्कळ चुका आम्ही नजरेआड केल्या..इथून पुढे नाही..." बाबा असे म्हणून फणका-याने बाहेर निघून गेले..

कमलाने सारे ऐकले होते. बाबूमामांची हकालपट्टी तिला सहन होणे शक्यच नव्हते..तिने बाहेर येऊन जणू काहीच ऐकले नाही असे दाखवत सहजच म्हटले, "मामा, उद्या मी येऊ का शेतावर? मला पाहायचं आहे सारं 

"कमलाताई...उद्या नको..मी नेईन तुम्हाला नंतर..."बाबूमामा

"मामा...हे कमलाताई काय? आणि मला अहो जाहो? मामा मी तुमची बबडी ना?" कमला म्हणाली

बाबूमामा काहीच न बोलता एकदम निघून गेले.

दुसरा दिवस उजाडला...सकाळीच कमला आईला सांगून बाहेर पडली.."आई, आज किती छान हवा पडल्ये...मी जरा नदीकाठची शोभा पाहून येते..."

कमलाने नंतरचे दोन तास कसे अन कुठे घालवले..कुणाच्या ध्यानी येण्याचं कारणच नव्हतं..

सुमारे दहा वाजता ती त्यांच्या शेतावर गेली..

जे पाहिलं त्याने तिला फार मोठा धक्का बसला...

एका बाजूला बैल अन दुस-या बाजूला बाबूमामा...नांगराला जुंपले होते आणि नांगरणी सुरू करणार होते...!!!

डोळ्यातला पाणी पुसत धावत ती तिथे पोचली.. बाबूमामांना रागावली..

"मामा..हे काय करताय? बाहेर या आधी..."

"ताई...बैल नाही चालत हो...अन आज नांगरणी झाली नाही तर धनी मला पुन: घरात घेणार नाहीत... 

कमलाने उंच हात करून हाक मारली...धोंडीबा...लगेच या...

व्यासगुरुजींच्या शेतीचे बैल घेऊन त्यांचा धोंडीबा दुरून येतांना दिसला...

संध्याकाळच्या सभेवर बाबा, बाबूमामा आणि चार दोघे जमले होते

"बाबूमामा... टिकलात तुम्ही कमीतकमी अजून काही दिवस...असं ऐकतो आहे की आज नांगरणी केलीत तुम्ही.."

"हो धनी...देवाच्या कृपेने आज नांगरणी झाली..." इतक्यात कमला आतून बाहेर आली. तिने बाबूमामांना "चूप रहा" असे बोटाने खुणावून सांगितले..

तसं नवीन काहीच नव्हतं सांगा-ऐकायला...गेले सारे..बाबाही बाहेर गेले.

इतक्यात आईची हांक आली

"बाबुराव हे घ्या चार घास खाऊन जा...आणि हे घरी न्या मामीसाठी...आज माझे अष्ट-मंगळवाराचे व्रत संपले..गोड भात केला आहे"...

बाबूमामा आत आले खरे पण अचानक त्यांनी हम्बरडाच फोडला..

"यमे.. अगं भाग्यवान गं मी...मला किती गोड नात दिलीस...!!!"

आईला काहीच उमगेना...कमलाने मग सारा वृत्तांत सांगितला..व्यास गुरुजींनी तात्काळ बैल द्यायला कसा होकार दिला ते सांगितले..

जेवण उरकून शांत मनाने बाबूमामा घरी गेले..कमला आणि आई दोघीच होत्या आता तिथे..

"आई एक सांग...तुला त्यांनी 'यमे' कसे म्हटले? आणि मी काय त्यांची नात???"

आई उत्तरली..

"कमळे, बाबूमामा हे खरे माझे सावत्र मामा आहेत बरं..."...!!!!!!!

कमलेला आत्ता व्यासगुरुजींचे एक वाक्य आठवले..
"चिमणे...तीव्र ऐवजी कोमल स्वर नेहेमी जवळ करावे...जसा यमनला कोमल रिषभ कसा हळूवार करतो आणि पूरिया कल्याण तयार होतो..."

मधुसूदन थत्ते
१५-०७-२०१४

No comments: