Sunday, November 29, 2015

अखेर ती एक छोटी कन्या होती, आई-बाबांची लाडली होती...हो, कधीकाळी...
जेव्हा ती "वसु-बेटा" होती...
"वसु-बेटा"ची वसुधा झाल्यावर आता खूप पावसाळे मागे गेले...अगदी खूप...
आज तीच वसुधा मला म्हणाली..
"काका, एका सुश्राव्य भावगीताचा आई मला अर्थ सांगायची...खूप लहान होते मी तेव्हा...पण अर्थ मनी खोल जाऊन बसला...कदाचित त्या गीतात आईच्या मनीचा "भाव" दडला होता का?...कुणी सांगावे...कित्ती वर्षे झाली त्याला...पण ते भावगीत अजून तसेच ताजे आहे...अनंत काळ ताजेच असणार आहे..."
"कुठचे गं हे भावगीत जे आज तुझ्याही मनात खोल खोल आहे...??'..मी विचारले...
"काका, त्या गीताचा राग संध्याकाळचा आहे...म्हणून संध्याकाळ झाली की अनेकदा मी ते ऐकते आणि डोळे पाणावतात..."...ती शून्यात बघत म्हणाली...
पुढे म्हणाली
"वर वर ते गाणे ऐकले तर लक्षात येत नाही की त्यात आईने शोधलेला भाव असावा...किती दशके झाली आई जाऊन...असती तर आजच्या ह्या वसुधाने तिला विचारले असते...'आई, सांग तू काय काय अनुभवलेस ते'..."
"हो पण ते गीत...?" मी अधीर होऊन विचारले..
वसुधा म्हणाली..."गीतातली ती स्त्री म्हणते...हे माझ्या जिवलगा...माझ्या परमेशा, ..ते माझे लाडले विश्व दूर, दूर राहिले ..माथ्यावरचे ओझे आता जड जड झाले बघ..आयुष्याची ही वाटचाल करून पाऊल थकले रे ..सुख-दु:खाची माया सरली...गेली...गेली...फक्त पाचोळा उरला रे आता...मी तर निराधार झाले रे...कधी मला हृदयाशी घेशील आता...??"
"बस..बस...समजले मला ते गीत.." मी तिच्या डोळ्यात पाहून बोलून गेलो..
मित्रांनो, तुम्हाला तर ते गीत लग्गेच आठवले असे नाही का?
हे घ्या...ऐका..
मधुसूदन थत्ते
२९-११-२०१५

Saturday, November 21, 2015

कल्पना कथा
◘◘◘◘◘◘◘◘◘
एक हसतमुख चेहेरा सामोरा आला...वय असेल सत्तरीचे...माझ्याहून थोडे लहान असे हे गृहस्थ उजवीकडे झुकले होते आणि म्हणून दुडकी चाल होती त्यांची...कारण हातात पाच किलो वजनाचे दळण एका पिशवीत होते..
हसले तोंडभर मला पाहून..."सुनबाई कामाला जातात मग मीच आणतो भाजी, दळण, किरकोळ बाजार हाट..."
ओळख ना पाळख...पण जणू मी त्यांचा शाळा-मित्र...
मी पुढे झालो, "चला मी पिशवीचा एक कान पकडतो, तुम्ही दुसरा..तेवढेच ओझे कमी..."...मी
"अहो मला जायचं सारंग complex मधे, जातो मी हळू हळू..."...ते म्हणाले..मग मी कोण तुम्ही कोण अशी नावे सांगितली आम्ही...
ते होते दत्तू जोशी...
मी आग्रह केला आणि केली त्यांना मदत..
पण हा हसत मुख चेहेरा काही मला विसरणं शक्य नव्हतं..होईन का मी कधी असा हसतमुख..? उगीच वाटून गेले ...
ह्यानंतर काही काळ गेला. एक दिवस मी मंडईत भाजीसाठी गेलो होतो...कानी संवाद आला..
"अहो, कांदे साठ रुपये? चाळीस होते ना काल परवा...बघा काही कमी करा...मालकीण रागावतील नाहीतर..."
मी पाहू लागलो...कोण आहे हा ज्याला मालकिणीची भीती वाटते आहे...
अन, माझ्या आश्चर्याला सीमाच उरली नाही...
ते होते दत्तू जोशी..
भाजी घेऊन बाहेर मी त्यांना गाठले...
"नमस्कार, ओळखले का?"..मी
ते जरा चमकले पण म्हणाले.."हो पाहिले आहे मी तुम्हाला ..बिबवेवाडीत रहाता ना?"..
मी आग्रहाने त्यांना गाडीत बसवले, नाहीतर १३ नंबरच्या बसने जाणार होते ..तसेच ते आलेही होते.
ह्यानंतर आणखी काही काळ गेला. एक दिवस मी ठरवले दत्तू जोश्यांच्या घरी जायचेच...घर-पत्ता आता ठाऊक होताच..
गेलो..
"मी मधुसूदन थत्ते" दार उघडलेल्या तिशीतल्या एका बाईला मी सांगितले..
"दत्तू जोशी इथेच रहातात ना..?"
ती स्त्रीही अतिशय हसत मुख आणि प्रसन्न चेहे-याची होती..आत शिरताच धुपाचा सुवास दरवळलेला अनुभवला...
"हो, या ना आत...दत्तुकाका जरा बाहेर गेले आहेत.....ती
"ओहो..मग मी येतो नंतर..." मी उठू लागलो...
"अहो नको..थांबा...मी ओळखते तुम्हाला...तुमच्या posts मी नित्य वाचत असते...फेस बुक मित्र आहात तुम्ही माझे...पहा रेवती पाटणकर नाव"...ती..
मी चाटच पडलो...
"नाही मी सहजच आलो होतो...तुमचे सासरेबुवा मला फार आवडतात..भेटत असतो आम्ही अधून मधून..."
"आहेतच ते फार प्रेमळ आणि खूप कष्टाळू पण.."...ती
"हो. जड दळण आणतांना मी पाहिले आहे त्यांना...आणि भाजीवाल्याला भाव कमी कर सांगतांना म्हणतात...सुनबाई रागावतील इतकी महाग भाजी आणली तर..."..मी
"काका, तुमच्या सारख्या ज्येष्ठापासून मी काय लपवून ठेऊ..? अहो ते माझे सासरे नाहीत...!!!"
"म्हणजे?."...मी
"दत्तूकाका माझ्या सास-यांकडे कारकून होते. जमिनी-शेती...ही सारी कामे चोख पहायचे..सासरे गेले...दत्तूकाकांना कोणीच आधार उरला नाही. मग आम्ही त्यांना इथे आणले....
तुम्हाला दिसले मला सुनबाई म्हणताना...पण..खूप सांगून पाहिले..मला ते सुनबाई कधीच म्हणाले नाहीत...रेवतीताई असेच म्हणत रहातात...!!! "...ती
माझे न विचारलेले प्रश्न तिने जाणले. म्हणाली...
"काका, मामंजी गेले पण दत्तूकाकांनी त्यांची जागा घेतली...तसेच प्रेमळ..पण कष्ट करणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले...खूप कामे करत असतात घरातली..."...ती..
इतक्यात बेल वाजली..
दत्तूकाकाच होते.
आत आले. मला पाहिलं आणि तेच नेहेमीचे चेहे-यावरचे प्रभावी हास्य आतले वातावरण बदलून गेले...
"अलभ्य लाभ...थत्ते काका...तुम्ही...?? सुनबाई चहा टाका मस्त...कधी घेत नाही पण आज मी चहा घेणार..."..दत्तू काका..
मला वाटतं आज रेवतीला दत्तूकाकांनी आयुष्यात प्रथमच सुनबाई मानले होते...!!!!
मधुसूदन थत्ते
२१-११-२०१५
(Representative picture from Google)

Friday, November 20, 2015

NO..No..No No...मला कुठल्या TV सिरियलवर लिहायचे नाही मित्रांनो..

ती एक कोकणातली अविस्मरणीय कथा आहे...वाचावी आपण पुढे..

खूप जुनी गोष्ट...६५ वर्षापूर्वीची...त्यातली मी धरून फक्त २-३ पात्रे आज ह्यात आहेत...

आम्ही दादरहून तळकोकणात गेलो होतो..मी, माझे आई-बाबा आणि एक शेजारची १८ वर्षाची नववधू ...नाव कुसुम...

गरती कुसुम माहेराला आली अन कावीळ झाली...घरी एकटी आई...त्यात ती होती लंगडी..पण पक्की तळकोकणी मात्र... 

काविळीवर उत्तम उंपाय करणारे तिच्या गावी होते एक गृहस्थ... पण कुसुमला न्यायचे कोणी अन कसे..?

अशा वेळेला माझे बाबा सदैव जबाबदारी घ्यायला तत्पर असायचे...अन अशा प्रकारे आम्ही चौघे पोचलो त्या तळकोकणातल्या खोलखंडोबाच्या गावी...

चौकशी केली..त्या गृहस्थाना भेटलो...त्यांना अण्णा म्हणत. अण्णांनी आमची सोय शेजारच्या मोकळ्या अन टुमदार घरी केली..

काय सुरेख घर होते ते..मला अजून आठवतय तो समुद्राचा गाज..वा-याची फडफड...आणि घराच्या झरोक्यातून अधून मधून येणारी फू फू....वा-याचा झरोक्याताला तो आवाज अजून माझ्या कानात आहे...
पण त्याचे कारण वेगळे आहे..

लगेच औषध सुरु झाले..तो होता मंगळवार. 
"
एक दिवस अजून थांबा..मी उद्या तपासतो अन मग जा मुंबईला".. अण्णांची आज्ञा झाली 

दिवेलागणीला डावीकडे सूर्य पाण्याला टेकत होता तोच दारी शेजारची एक नववधू आली..गरती होती. सुरेख असे नऊ-वारी लुगडे..नाकी नथ..हाती झाकलेले असे काही ...अन मधुर आवाजात आईला म्हणाली..

"
आई, नमस्कार करते..." अन तो सुंदर असा वाकून तीन वेळा केलेला नमस्कार..हल्ली दिसत नाही असा फारसा..

"
मला कळल आलात..मी शेजारचीच आहे..अण्णांच्या पलीकडची..मोदकाचा प्रसाद आणलाय.."

तिने रुईच्या पानातला तो प्रसाद आईला दिला ..."

"
अगं आत ये, बस जरा..." माझी आई म्हणाली..

"
नको..आधीच उशीर झालाय...मैत्रिणी जमल्यात तिथे पारावर..."...ती उत्तरली...कुसुमकडे पाहून गोड हसली अन झाली पसार...

जरा वेळाने अण्णाही आले... "हा अंगारा घ्या..कुसूमला निजताना लावा नक्की..."

निजायची वेळ झाली...

काय उंदीर होते त्या परिसरात...असे सुळकन पळायचे इकडून तिकडे...

माझ्या आईने मोदकाचा प्रसाद आणि अंगारा ईशान्येला कोप-यात ठेवला ...देव असतात ना त्या दिशेला...!!!

मध्यरात्री केव्हातरी खूप वारं सुटल्याचा आवाज होत होता...भिर्र भिर्र.फर्र फर्र...

मी जागा तर झालो पण भीती वाटत होती..हळूच एक डोळा उघडून वर पाहिले...झरोक्यातून आवाज येतच होता वा-याचा...भिर्र भिर्र.फर्र फर्र...च्या जोडीला फू फू....!!!!

सकाळी ईशान्येच्या कोप-यात आई देवाला नमस्कार करायला आणि कोप-यात ठेवलेले मोदक आणि अंगारा घ्यायला आई जाते तो काय...उंदरांनी मोदक पळवले होते की...!!!

आज आम्ही निघणार परतीला..निरोपासाठी अण्णांच्याकडे...जायचे..तर मधेच आई थबकली...
"
ती कालची मोदक देणारी मुलगी मी ह्या घरात पाहिली...चला जरा भेटन येऊ..."

गेलो घरात...मंगळागौरीच्या गाण्यातले बसफुगडीचे गाणे गोड आवाजात ती मुलगी म्हणत होती.. फू बाई फू फुगडी फू...फू बाई फू फुगडी फू...आणि सुंदर खळखळून हसली...

आईने ओळख करून दिली-घेतली..

"
काय गोड आवाज आहे हो तुमच्या मुलीचा...बोलावता का तिला....??"...आई म्हणाली..

"
माले...ये ग जरा बाहेर..." हाक दिली आईने..

मालू आली....अन...अन...लंगडत आली..तिचा एक पाय अधू होता..!!!!

आई पहातच राहिली...म्हणणारच होती "तूच काल आली होतीस ना...??" पण थांबली..

मालूची आई पुढे झाली...म्हणाली..

"
काकू..एका अपघातात हिचा पाय गेला...अन काय सांगू...हिची जुळी बहिण त्यातच गेली...गरती होती हो...!!!"

आई नुसती हसली...आम्ही निरोप घेतला...सर्वांचाच...मालूचा, तिच्या आईचा आणि अण्णांचा...

मी आईला हळूच म्ह्टल्याच मला आठवतय..

"
आई..ते मोदक उंदरांनी नव्हते हो खाल्ले...!!!"....अन आईने मला गप्प केले...
कुसुम समोर हे बोलायचे नव्हते ना......!!!!!!!!

(
माझी संपर्ण स्वतंत्र कथा..आत्ताच लिहून पूर्ण केली ) 
Representative pictures taken from Google.
मधुसूदन थत्ते 
२६-१२-२०१४


मी महादेव; आपटे काकूंचा ड्राइव्ह्रर
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

ड्राइव्ह्रर म्हणून दहा वर्षे मी सरदार आपट्यांच्या घरी नोकरी केली... अन एका क्षुल्लक कारणावरून नव्या पिढीतल्या शिवराम आपटेनी मला काढून टाकले....

ह्यालाही आज पंचवीस वर्षे झाली..

आज माझा स्वत:चा कार-डीलरशिप चा मोठा व्यवसाय आहे...लौकिक अर्थाने मी "बडा" आहे पण मनाने अजून आपटे काकूंचा (शिवरामची आई) "महादेवच" आहे...फार लोभ त्या पुण्यवान बाईचा माझ्यावर...

आज हे का आठवलं मला? तेच तर सांगायचय...

मी गावाच्या हद्दीबाहेर कामाला जाऊन परतत होतो....अचानक मला आपटे काकू दिसल्या...एका झाडाखाली उभ्या होत्या...बारीक पाऊस पडत होता..

मी गाडी थांबवली...अदबीने त्यांना म्हटले "काकू, मला नाही ओळखात? अहो मी महादेव..."

त्या घाईत दिसल्या, किंचित हसल्या असा मला भास झाला पण मी दार उघडले मागचे तशा जाऊन बसल्या आत...

थोडा वेळ गेला...मला कळेना काय बोलू? ह्यांनी मला बहुतेक ओळखले नाही...

इतक्यात टायरचा काही आवाज आला म्हणून मी गाडी थांबवून खाली उतरलो...जरा पाहिले...एक लांब काडी अडकली होती...मी आत आलो अन गाडी चालू केली..मनात गाडीच होती...आता सर्विसिंगला द्यायला हवी...

मागच्या आरशात पाहिलं..काकुंशी काही बोलावे वाटले..

पण...काकू कुठेत?..

म्हणजे मला न सांगता ह्या उतरल्या बहुतेक गाडी थांबवली तेव्हा...

तडक गेलो सरदार आपट्यांच्या घरी...विचारावे म्हटल...काकू कुठे गेल्या होत्या...

शिवराम होता...बराच वयस्क दिसला...त्याने मला बिलकुल ओळखले नाही...

मग सांगितले..."मी महादेव..."

तो गोंधळाला...मग त्याला सारे घडलेले सांगितले....

"
कुठे उभी केली होतीस तू गाडी?" त्याने अधीर होऊन विचारले...

"
या, मालक...मी नेतो तिथे तुम्हाला...." मी

मग आम्ही दोघे गेलो त्या जागी...काकू बहुतेक चालत चालत पुढे गेल्या होत्या..

"
महादेव...ही समोरची पाटी वाचलीस का" शिवराम म्हणाला..

मी वाचली...

"
आईने इथे नाही तर कुठे जायचे आता...?" महादेव..

मी चरकलो...त्या पाटीवर लिहिले होते..."स्मशान भूमी इथून २ किलो मीटर आहे"

शिवराम म्हणतच होता..."आई दहा वर्षांपूर्वीच गेली महादेव..." !!!!!!!!!!!

◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

ही माझी संपूर्ण स्वतंत्र कथा आहे 
(I have suggested to some friends to translate this in English since I know their fluency in English language)

मधुसूदन थत्ते
०७-१०-२०१४

तीन मडकी
========

भिकंभट एक गरीब ब्राह्मण होता. घरात अठराविश्व दारिद्र्य. पदरी तीन मुले..पत्नीपुढे नित्य प्रश्न ..काय घालू ह्या मुलांना रांधून..?

मग व्हायची रोज नवरा बायकोत भांडणे... भिकंभट महा आळशी..काही काम मिळते का हे बघायचा प्रयत्नही करायचा नाही. अन्नाऐवजी बायकोच्या शिव्या खाणे नशिबी आले तरीही उठून काम शोधायला काही जायचा नाही.

एके दिवशी बायकोचा राग विकोपाला गेला...तिने भिकंभटला निर्वाणीचे सांगितले..
"
आज तुम्हाला नुसते लोळत पडू देणार नाही मी...आत्ताच्या आत्ता काम शोधायला जा आणि जोपर्यंत खायला अन्न आणत नाही तोपर्यंत घरात मी तुम्हाला घेणार नाही..."

भिकंभट, बिचारा...त्याला काहीच करणे जमायचे नाही तरीही त्याने आज प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही...
आता काय करावे? तो रडू लागला..चालत चालत जंगलात गेला आणि एका झाडाखाली बसून राहिला...

शंकर-पार्वती त्यांच्या रोजच्या पृथ्वी प्रदक्षिणेवर होते...

पार्वती.."हे शंभो, कोण रडते आहे? आपण नित्य लोकांची मदत करता असतो...चला पाहू कोण रडत आहे.."

शंकर..."हे गिरिजे...असे सतत दान करून आपणच खूप दरिद्री झालो आहोत...काय आहे आता आपल्याकडे कुणाला द्यायला?"

पार्वती.." अजून ही तीन मडकी आहेत ना मंतरलेली....एक देऊ हे कोण रडते आहे त्याला..."

ते ब्राह्मणाकडे आले त्यांना त्याचे दु:ख कळले आणि त्याला त्यांनी एक मडके दिले..

शंकर: "हे ब्राह्मणा, हे उपडे करून तीन वेळा म्हण "पड पड पड" म्हणजे ह्यातून मुरमुरे-फुटाणे येत रहातील....ते घे आणि धंदा कर...खूप श्रीमंत होशील...."

भिकंभटाला आनंद झाला. मनात म्हणाला आता मी बायकोला दाखवतोच मी काय करू शकतो ते ...

घरी येता येता त्याला सुचले नदीवर स्नान करावे आणि शुचिर्भूत होऊन नवा धंदा सुरु करावा,,,

समोरच्या वाण्याकडे त्याने मडके ठेवले आणि त्याला निक्षून सांगितले.."हे नीट ठेव. पाडू नकोस..."

भिकंभट गेला खरा पण पुन: परतला आणि त्याने वाण्याला पुन: काळजी घे म्हणून सांगितले आणि गेला नदीवर.

इकडे वाण्याला संशय आला. काय असावे ह्या मडक्यात? त्याने ते उपडे केले..हलवले..पण काही नाही..तो चिडला आणि अखेरचे रागाने म्हणाला "पड पड "

तो काय...मुरमुरे फुटाण्याच्या राशी येऊ लागल्या...

त्याने तात्काळ बायकोला बोलावले आणि म्हणाला..
"
असेच एक मडके लगेच घेऊन ये आणि हे लपवून ठेव"

भिकंभट खुशीत परत आला, मडके घेऊन घरी गेला. बायकोला म्हणाला...

"
आता आपण श्रीमंत होणार...बघ हे मडके..."

"
डोंबल तुमचं.. मडके काय घेऊन आलात..अन्न हवे आम्हाला..."

"
अगं..तीच तर जादू आहे.....हे बघ..." आणि त्याने मडाके उपडे करून "पड पड.." म्हटले....पण कसले काय? वाण्याने मडके बदलले होते..."

त्याची फजिती पाहून बायको जास्तच संतापली आणि तिने त्याला पुन: घालवून दिले...

भिकंभट तडक वाण्याकडे गेला..

"
तू मला फसवलेस..माझे खरे मडके दे..हे माझे नाही..." आणि मारामारीवर आला

वाण्याने आरडा ओरडा केला...लोक जमले आणि सारी कथा ऐकून त्यांनी ब्राह्मणाला हाकलून दिले...

बिचारा ब्राह्मण...आला पुन: जंगलात आणि बसला रडत त्याच झाडाखाली...

शंकर-पार्वती त्यांच्या नेहेमीच्या आकाश-फेरीवर होतेच. पार्वतीने भिकंभटाला पाहून शंकराला म्हटले..

"
आता काय झाले ह्या ब्राह्मणाला? चला जाऊ आणि विचारू..."

शंकर म्हणाला "अगं..आता असे सर्वांना काही काही देऊन आपणच दरिद्री होत चाललो आहोत..ह्याला आता काय देणार?"

"
का? अजून दोन मंतरलेली मडकी आहेत ना ? देऊ त्याला एक " पार्वती..

दोघे आले भिकंभटापाशी...

भिकंभटाने रडत रडत त्यांना सांगितले कसे वाण्याने फसवले ते.

पार्वती पुढे झाली..त्याच्या हातात दुसरे मडके देऊन म्हणाली..

"
हे घे. हे उपडे ठेऊन पड पड म्हण ..मग ह्याच्यातून राक्षस बाहेर पडतील...आणि शिव शिव म्हटलस की राक्षस नाहीसे होतील."

भिकंभटाला आनंद झाला. मागच्याप्रमाणे तो गेला वाण्याकडे ..

"
वाणीदादा ...अहो माझे मडके मिळाले बरं का.. मी उगीच तुम्हाला दोष दिला....आता हे नीट ठेवा..मी नदीवर जाऊन आंघोळ करून येतो आणि नेतो ते मडके...

लोभी वाण्याने ते मडके उपडे ठेवले आणि पड पड म्हणाला तो काय...आले की राक्षस बाहेर आणि त्या वाण्याला चोप देऊ लागले...वाणी गयावया करू लागला..
इतक्यात भिकंभट तिथे आले..वाण्याने त्यांना विनवले..अहो काहीतरी करा नाहीतर हे राक्षस मला ठार मारतील..
"
मग तू लबाडीने बदललेले माझे खरे मडके परत दे आधी.." भिकंभट
वाण्याने मुकाट्याने खरे मडके परत केले. दोन्ही मडकी घेऊन भिकंभट घरी आला.

त्यानंतर त्या चण्या-मुरमु-याच्या मडक्यामुळे तो खूप श्रीमंत झाला...बायकोला दागदागिने मिळाले...

एकदा भिकंभट गावी गेल्यावर त्याचा मुलात झाली बाचाबाची...एक म्हणे आज मी मडके वापरणार तर दुसरा म्हणे नाही मी..

त्यात काय झालं की ते मडके खाली पडले आणि फुटले....

भिकंभट घरी येतो तो काय नुसती रडारड दिसली घरी...त्याची बायको म्हणाली..

"
अहो, माझं ऐका ..पुन: जा आणि त्या झाडाखाली बसा...मिळालं आणखी मडकं तर पहा जरा.."

भिकंभट पुन: गेला आणि तेच सारं पुन: घडलं..पण ह्यावेळी जे मडके मिळाले त्यातून पंचपक्वान्ने येणार होती...

भिकंभट घरी आला...पुन: त्याच्या घरी लक्ष्मी नांदू लागली

हे पाहून गावातला एक धनिक सावकार मत्सरानी वेडा झाला..त्याने भिकंभटाला विनवले..

ह्या पौर्णिमेला माझ्या घरी हजार माणसे जेवायला येणार आहेत..तुम्ही जेवणाचे सारे बघा..मी खूप पैसा देईन” ..

भिकंभट बिचारा गेला...त्याला एक स्वतंत्र खोली दिली होती..त्याने मग मडक्यातून उत्तम पदार्थ काढले..पंगती बसल्या...इतक्यात तो सावकार परत आला...त्याने भिकंभटाच्या खोलीला लावले कुलूप...आणि म्हणाला आता मरा इथेच...कुणी तुम्हाला सोडवणार नाही..खा जे ते मडके देईल ते..

भिकंभट गयावया करू लागला...अखेर त्या मडक्याच्या मोबदल्यात त्याची सुटका झाली..

धनिक मडके घेऊन पळाला आणि भिकंभट जीव घेऊन पळाला

घरी त्याच्या बायकोने त्याच्या हातात ते राक्षसाचे मडके दिले आणि पाठवले त्याला सावकाराकडे.

तिथे गेल्यावर त्याने सावकाराला म्हटले..

"
हे घ्या आणखी एक मडके..ह्यातून आणखी चांगले पदार्थ मिळतील"

लोभी सावकाराने ते मडके घेतले आणि पड पड म्हणाला तो काय..आले की राक्षस बाहेर आणि चांगला बदडून काढला त्या सावकाराला..

मग सावकार गयावया करू लागल्यावर भिकंभटाने त्याच्या आधीच्या मडक्याच्या मोबदल्यात शिव शिव म्हणून राक्षसांना घालवले

भिकंभट घरी आला आणि त्यानंतर सुखाने संसार करू लागला...

संक्षिप्तीकरण : मधुसूदन थत्ते
०३-०९-२०१४
मूळ बंगाली कथा...साने गुरुजींच्या गोड गोष्टी पुस्तकातून घेतली.

शनी रे शनी 
========

रोजचा ऑफिस ला जाण्याचा तो त्याचा जिना होता..इतके महिने तो त्यावरून वर खाली करायचा ते अगदी सहज आणि त्याच्याच तंद्रीत असायचा...

आज तिस-या मजल्यावरच्या अखेरच्या पाय-यां चढतांना त्याचे लक्ष एकदम उजवीकडल्या भिंतीकडे गेलं..

त्याला आशर्य आणि आनंद दोन्ही एकदम वाटलं...

"
अरे..मी आजवर हे कसे पाहिले नाही..??" तो पुटपुटला...

समोर भिंतीवर एक अस्पष्ट अशी गणेशाची छाया त्याला दिसली... छाया का म्हणायचे तर ते लोकांचे हात लागून लागून डाग पडून त्यातून निर्माण झालेले आहे हे त्याने ताडले...

पण..

खरच आजवर त्याने हे पाहिलंच नव्हतं ..

ह्यानंतर ती छाया हे त्याचं नित्याचं दर्शन केंद्र होऊन गेली...

नकळत हल्ली तो देवळासमोर करतात तसा हात छातीला लावायलाही लागला...

त्याच्या दोन एक महिन्यात लक्षात आले की हल्ली साहेब त्याच्या कामाची स्तुती करायचा...इतरांनाही त्याच्यासारखे काम करा असे सांगायचा (हे त्याला त्याच्या सहका-यांनी सांगितले होते)

घरीही त्याला वेगळे वातावरण दिसू लागले...बायको आणि मुलगा नेहेमीपेक्षा जास्त आदर देतात आपल्याला असे त्याला वाटायला लागले...

एक दिवस जिना चढतांना त्याने त्या गणेशाच्या छायेला नमस्कार केला आणि चक्क सांगितले...

"
देवा, काय रे चमत्कार केलास?"

तसाच तो वर आला...

आज साहेब नव्हता...रा मोकळीक होती. इतक्यात कुळकर्णी आलाच ..

"
चल रे आज एकत्र चहा घेऊ..." कुळकर्णीने सुचवले अन गेले दोघे त्या दिशेने..

"
मित्रा...गेले दोन महिने बघ सारी चक्रे कशी तेल घातल्यासारखी सुरेख फिरतायत.." तो

"
म्हणजे? मला नाही समजले?" कुळकर्णी

मग त्याने ती छाया आणि त्यामागे असलेल्या सा-या गोष्टी कुळकर्णीला सांगितल्या...

कुळकर्णी पडला ज्योतिषी...कुडबुड्या का होईना...कळायचे त्याला थोडेफार...

"
तुझी रास कुठली?" कुळकर्णी

"
मकर" तो उत्तरला

"
मग बरोबर आहे, मित्रा...अरे बरोब्बर दोन महिन्यापूर्वी गुरु वृश्चिकेला गेला....म्हणजे मकरेला अकरावा...म्हणजे आता तेरा महिने चंगळ करा राव"

तो आनंदला....मनात म्हणाला..."तरीच...सर्व बाजूंनी अनुकूलता दिसते आहे...."

नियमाने तो त्या छायेला हल्ली नमन करायचा...जणू त्या छायेनेच गुरूला उचलले आणि वृश्चिकेला आणून बसवले...

असे सहा महिने गेले...

त्याला खात्री झाली की दैव आपल्यावर खूष आहे...त्याने थोडे कर्ज काढून घरात छान सुखसोयी करून घेतल्या... 

एक दिवस असाच तंद्रीत तो वर आला...आज आपण त्या छायेला नमन केले नाही हे त्याला उमगलेच नाही...

कामाच्या जागेवर आला तो शिपायाने निरोप दिला

"
साहेब बोलावतायत.."

तो गेला साहेबाकडे...त्याच्या अपेक्षा नक्की वाढल्या...आज प्रोमोशन नक्की मिळणार....

साहेबासमोर बसला खरा पण साहेबाने वर सुद्धा पाहिलं नाही...त्याच्या हातात एक पत्र दिले...

त्याला तात्काळ V R S ची आज्ञा झाली होती...

एकदम त्याच्या लक्षात आले ...आज आपण छायेला नमन केले नाही...म्हणूनच हे झाले...

तो बाहेर आला साहेबाच्या खोलीतून..

समोर कुळकर्णी उभा होताच.. 

"
काय रे अकरावा गुरू तेरा महिने असतो ना?" तो...

कुळकर्णी तात्काळ उत्तरला...

"
मित्रा ते खरं रे ...पण...पण...कालपासून तुझ्या राशीला साडेसाती सुरु झाली आहे शनीची..."

त्याचे मस्तक घिर घिर फिरले....

शनी काय फिरेल इतके...!!!


मधुसूदन थत्ते
२५-०८-२०१४
(
ही माझी संपूर्ण स्वतंत्र कथा आहे...आत्ताच लिहून हातावेगळी केली आहे)

तळ टीप :: मित्रांनो साडेसाती नव्हे...मन वाईट असतं.. काही तरी अगदी ग्राह्य धरून बसतं...सारासार विचार करणं आणि परिणामी कर्तव्याची जाणीव ठेवणं हेच मन विसरतं... 
पण शनी कामी येतो excuse म्हणून.


कर्तृत्वाचा परिमल
=============

रोजची फिरायची वेळ. आज काय बरं दिसणार? 

एक वयस्क जोडपे दिसले चिंतीत मुद्रा अन बहुतेक काही problems वागवत जात होते. 
एक ढेरपोट्या इसम नकोसा दिसत होता. 
दोन विशीतल्या मुली कुजबुजत जात होत्या...
कुणीही समाधानी असे चेहे-यावर दिसेना...

नेहेमीच्या कट्ट्यावरले चार वृद्ध पाहून नेहेमीसारखीच मला खंत वाटली की हे mostly माझ्याहून वयाने जरा जरा लहान असूनही मैत्रीचा आनंद रोज लुटतात, ज्याला (म्हणजे अशा "कट्टा" मैत्रीला) मी पारखा आहे...!!! 

त्या चौघांनाही आपापल्या कर्तृत्वाचा पिसारा (की पसारा?) नित्य उघडून सांगावा असे वाटत असणार हे नक्की.

जरा पुढे गेलो. एक माझ्याहूनही वृद्ध गृहस्थ एकटाच culvert च्या कडेला बसला होता. 
आज हे दृश्य मला नवे होते. साधा पेहेराव...धोतर आणि इस्त्री नसलेला सदरा, हातात दांडा मोडलेली छत्री आणि दृष्टी जणू क्षितिजाकडे लागलेली.

मी जवळ गेलो. "नमस्कार काका. आज प्रथमच भेटलात मला"..मी

"
ह्ह ह्ह " असे ओठ किंचित विलग करून ते अतिशय मधुर हसले....माझ्याकडे त्यांनी एकदा पाहिले आणि पुन: क्षितीज. 
पण ह्या दोनक्षणात मला त्यांचे भव्य कपाळ दिसले. लांब अशा कानाच्या पाळ्या लोंबत्या दिसल्या...आणि...आणि...त्या कपाळावरच्या असंख्य आठ्या...अगदी नैसर्गिक उमटलेल्या...जणु corrugated कपाळ...!!! 

कुठे रहाता, काय करता असले mundane प्रश्न विचारायचे मी टाळले. मनात काही बेरजा-वजाबाक्या केल्या आणि ठरवले की हे रिटायर्ड पेन्शनर असावेत...चाकरी इमानाने केली आहे आता इथे मुलीकडे (बहुतेक) काही दिवसासाठी आले असावेत.

काहीच बोलणे झाले नाही अन मी निघालो.
"
नमस्कार, निघतो. भेटू पुन:"..मी

"
हो नक्की 'ह्ह ह्ह' " ते. पण नंतरच्या त्यांच्या expression ने मी clean bold झालो. म्हणाले

"
मी पाहिलय तुम्हाला. जोशांकडे आला होतात..."

.
जोशी हा माझा मित्र. महिन्यापूर्वी पुण्यात बदलून आला आणि इथे एकाच्या out house मध्ये तात्पुरता रहातोय. 

"
म्हणजे...तुम्ही...तिथेच रहाता कुठे?"..मी

"
हो जवळच आहे तिथे" .....ते.

मला माहित होते की त्या area त खूप श्रीमंत लोकांचे बंगले आहेत. अशाच एका बंगल्यात जोशी तात्पुरता आला आहे. पण हे गृहस्थ त्यातले काही वाटत नाहीत. तेवढे कपाळ अन कानाच्या पाळ्या सोडल्या तर ह्यांच्यात श्रीमंती कुठेच दिसत नाही.

मी जरासा हसलो अन घरी आलो.

दुसरे दिवशी जोशी माझ्याकडे आला होता. त्याच्यापाशी मी ह्या वृद्धाचा उल्लेख केला.

"
हो का? तुला ते भेटले का? अरे नुकतेच ते आणि त्यांच्या पत्नी अमेरिकेहून आल्या आहेत. त्यांच्याच बंगल्यात मी रहातोय ना...!!! साधा आहे रे माणूस. मी भाग्यवान बघ. मला म्हणाले रहा आम्हालाही सोबत होईल." जोशी

मी पुटपुटलो..."हो अगदी साधा रे..मला म्हणाले मी तिथे जवळच रहातो... त्यांना सांगता आले असते तुमचे मित्र माझ्याच out house मध्ये रहातात म्हणून…..!!!!!!!"

मित्रांनो...हा कर्तृत्वाचा पिसारा नव्हे, आणि पसाराही नव्हे 

हा आहे सौजन्याचा, नम्रतेचा. परिमल.

(
माझी स्वतंत्र संपर्ण कथा आजच लिहिलेली)
(
चित्र गुगल वरून प्रातिनिधिक म्हणून घेतले.)

मधुसूदन थत्ते
११-०५-२०१४

माझे Intuition
==========

माझा CID मित्र रवी कधी कधी मला बरोबर घेऊन जातो investigation साठी.

का? तर म्हणतो "तुझ्यात असे काही आहे ज्याने मला clue लवकर कळतात"

एकदा प्रसिद्ध ज्योतिष जाणकार डॉ. प्रतिभा सुळे ह्यांचेकडे चल म्हणाला.

ह्या नावाचा बराच गवगवा होता शहरात.

बाई सहज भेटत नसत. Consultation ची त्यांची फी highest होती. ह्या कशाच्या डॉ आहेत हे मला एक कोडेच होते. रवीला अर्थात appointment लगेचच मिळाली.

आम्ही त्यांच्या प्रशस्त कॅबीन मध्ये गेलो. सारीच श्रीमंती. असे म्हणतात की फार मोठे नेते, सिने-कलाकार ह्यांचा इथे राबता असतो..be that as it may...!!!

आज एका सिनेनटीच्या आत्महत्येसंबंधी रवी तिथे पोचला होता...

मी उगीचच माझ्या intuitionला धार लावत बसलो होतो.

इतक्यात डॉ. प्रतिभा उठल्या आणि पाठमो-या होत त्यांनी आणखी एक दिवा लावला...अन...क्षणात त्यांच्या मानेवर असलेलं तुळशी पान मला दिसलं.... आणि coincidence म्हणा की काही म्हणा, बसतांना त्यांनी माझ्याकडे अतिशय रोखून पाहिलं...क्षणभरच पण मला जरा ते अनैसर्गिक वाटलं...

निघतांना मी मुद्दाम खाली झुकलो...बुटाची लेस बांधण्याचे निमित्त. रवी बाहेर गेला सेक्रेटरीला काही विचारायला. ती संधी साधून मी बाईना म्हटले...

"
शारदा चिरमुले ह्या नावाचे कोणी इथे येतात का?"

त्यांच्या स्थिर नजरेत किंवा bearing मध्ये काहीच फरक दिसला नाही. इतकेच म्हणाल्या..

"
माझ्या client बद्दल मी कधी चर्चा करत नाही. येत असतीलही अन नसतीलही. पण तुम्ही आता जाऊ शकता."

घरी आल्यावर बराच वेळ डॉ. प्रतिभा काही माझ्या मनातून जाईनात. माझे intuition मला "in spite of me" काही गोष्टी करायला लावतं तेच ह्या केस मध्ये झालं.

मी ठाण्याचा...पण आलो दादरला दुस-या दिवशी. तडक गेलो माझ्या बालपणीच्या शिवाजी पार्क परिसरात. बालकप्रज्ञा शाळेत.
इथे प्रत्येक वर्षी SSC त शाळेत पहिला आलेल्या विद्यार्थ्याचा फोटो अन नांव इत्यादी एका फ्रेम मध्ये कायम ठेवण्याचा प्रघात होता..

एका फोटोकडे मी खूप वेळ पहात होतो. शारदा चिरमुले. १९६६ साल...माझी वर्ग भगिनी...मी रहायचा त्या बिल्डींगच्या जवळची "राजा-भुवन".

वेळ होता. आणि एकदा एक वेड मनाने घेतला की मी त्याचा पाठ पुरावा logical conclusion होईपर्यंत सोडत नसे.

पस्तीस वर्षापूर्वी रहात असलेली दोन चार कुटुंबे होती राजा-भुवन मधे अजून.
पण कुणालाही शारदा चिरमुले बद्दल काही सांगता आले नाही. एक पन्नाशीतली बाई मात्र म्हणाल..

"
तिची मोठी बहिण सायनला रहाते...करत असते फोन कधी मधी..."

बस...इतके पुरे होते मला.

पण मी का हे करतोय? काय साध्य होणार यातून? असेल आजची डॉ. प्रतिभा सुळे कालची शारदा चिरमुले...so what ?

पण ह्यालाच तर म्हणतात intuition ... काही तरी skeleton in the cupboard प्रकार आहे का? की उगीच मी वेळ दवडतोय?

घरी परतलो तो दारात एक चिठ्ठी...

"
डॉ. प्रतिभा ह्यांच्या ऑफिस मधून तू बाहेर आल्यावर सतत तुझ्यामागे मी आहे हे तुला माहित नसेल. हे जे चालवले आहेस ते त्वरित थांबव. अन्यथा परिणाम वाईट होणार"

मी तसाच माझ्या एका जवळच्या मित्राकडे गेलो...त्याला म्हटले..

"
मला एक urgent फोन करायचा आहे...करू का?"

CID
रवीला पूर्ण कल्पना दिली.

बाहेर येऊन आजूबाजूला कुणी "shadow " वाला आहे का पाहिलं. नाही दिसलं कुणी.

तीन दिवस काहीच घडलं नाही...

नंतरच्या पहाटे पाच ला फोन वाजला...

"
मी डॉ. प्रतिभा...तुझी शारदा चिरमुले...बोलत्ये...आत्ताच मी xxxx च्या international airport वर उतरले आहे. तुझा तो CID मित्र जरा ज्यास्तच खोलात शिरू पहात होता...म्हणून मला इकडे यावे लागले. तो माझा केसही वाकडा करू शकणार नाही पण त्याची मात्र आता धडगत नाही...

उरलास तू...एकतर आमच्यात सामील हो नाही तर तुझ्या CID मित्राच्याच मार्गाने तुला पाठवावे लागेल.

सामील होण्यास तयार असशील तर आपल्या शाळेच्या गेटपाशी तुला माझा हस्तक उद्या भेटेल. खूण म्हणून तुला परिचित अशा माझा, म्हणजे, शारदा चिरमुलेचा फोटो दाखवील.
नंतर काय ते हळू हळू तुला कळेलच.
बाय बाय..."

मित्रांनो अशी वेळ तुमच्यावर आली तर काय कराल?

मधुसूदन थत्ते
०४-०५-२०१४

"त्या बकुळीच्या झाडाखाली" 
===============

आज मी ठरवलं होतं की सूर्यास्ताच्या आधीच फिरायला निघायचेकारण एका विशिष्ठ जागी नेमक्या सूर्यास्ताला मला माझ्या विचारांचे अर्घ्य त्या रविराजाला द्यायचे होते. 

सुरेख वाट होतीगाव मागे टाकून मी बराच पुढे आलो. आजूबाजूला कोणीच नव्हते. असते तरी मी ह्या गावचा आठवड्याचा पाहुणा...कोणाला मी ओळखणार? पण इतका सुरेख परिसर...ही शुद्ध नदीकाठची हवा...मंद वारा स्पर्शून जाई तेव्हा शिरशिरी भरे अंगात. 

एक घार चित्कारत वरचेवर आली आणि गेली. पोपटांचा थवा भुर्रकन आला अन गेला सगळं कसं आलं अन गेलं असंच तर असतंतो सूर्य सकाळी आला...आता जाणारच...मी सुद्धा गावात आलो अन गेलो असंच नाही का?

सूर्यास्त पोटभर पाहून परतलो अजून गाव मैलभर दूर होते 

इतक्यात मला एक गोरापान वृद्ध एका झाडाखाली वाकून काही उचलत असताना दिसला 

मी जवळ गेलो 

तो बकुळ वृक्ष होता आणि तो माणूस फुले वेचत होता

हा वृक्ष येताना मला कसा दिसला नाही? माझं असंच असतं नेहेमी. समोर असून दिसत नाही .!!!!

"
काय म्हणता जावई बापू" जोशांचे तुम्ही जावई ना?"

मी मनात म्हटले, मी तर ह्यांना ओळखत नाही मग मला कसे ह्यांनी ओळखले?

"
घ्या, चार फुलं घ्या. आठवण राहील माझी वहीत ठेवा मात्र. "

त्यांच्याशी चार दोन गोष्टी बोलून मी निघालो तशी म्हणतात. 

"
वेळ आहे ना? मग या घरी...हा समोरचा बंगला माझा."

गेलो. भिडस्त ना मी!!!

"
या असे"

बाहेरच्या प्रशस्त खोलीत काही सुंदर पेंटींग्ज होती भिंतीवर 

"
ही सारी कला माझी आहे बरं का जावई " ते म्हणाले 

"
काय सुरेख आहेत हो" मी 

"
या. आमच्या सौं ना भेटा. " ते 

मला कुणी दिसेना. "आतल्या खोलीत आहेत का".......मी 

"
नाही होह्या काय समोर." अन समोर त्या सौं चे एक सुंदर चित्र होते त्याच्याकडे त्यांनी हात केला. त्या चित्राला बकुळीचा हार घातलेला होताआणि त्या फोटोतल्या बाई मंद स्मित करत होत्या. 

मी समजलो काय ते. त्यांच्या भावना आणखी चाळवायला नको म्हणून मी त्यांना वाकून नमस्कार केला अन काढता पाय घेतला. 

माझा परतायचा दिवस आला. आदल्या संध्याकाळी मी सास-यांना ह्या माझ्या भेटीबद्दल सांगितले पण एक तर माझे सासरे खूप अबोल अन गावाबाहेर कधी जात नसत. 

मीच आग्रह केला "चला, मी जायच्या आधी तुम्हाला नदीकाठी घेऊन जातो"

आम्ही दोघे निघालो. अंदाजाने आम्ही त्या जागी गेलो. बकुळ वृक्ष ही मोठी खूण होतीच ना!!

पण बंगल्याचा अंदाज येईना 

एक जुने घर दिसले, पण हे ते नव्हे असे मी मनात म्हणत होतो अन माझी पावले मात्र त्याच घराकडे जात होती. 

"
थांबा, मी जरा जाउन येतो " असे म्हणून मी मागे पाहिले तो सासरे माझ्या मागे नव्हतेच. दूर उभे दिसले. 

म्हणजे मी एकटाच पुढे इथवर आलो होतो तर,….!!!

मी आत शिरलो त्या दारातूनसमोरच्या भिंतीवर त्याच बाइंचा फोटो होतापण बकुळीच्या हारा ऐवजी जळमटे साचलेली दिसली  

आणि त्या फोटोतल्या बाई ओठ विलगून हसत होत्या चक्क. 

मी धूम धाव घेतली आणि सास-यांच्या जवळ गेलो"काय हो जावईबापू, केवढा वेळ घेतलात लघुशंकेला" 

मी ते नुसते हसण्यावारी नेले 

. 
मधुसूदन थत्ते 
१६-०४-२०१४
(
माझी संपूर्ण स्वतंत्र कथा)
V वर एक सुंदर भावगीत लागलं अन, स्नेहल कन्येला अचानक म्हणाली..

"
सेमल..please मोठं कर..मला नीट ऐकायचय हे गीत.."

सेमल पहात होती...आई अतिशय तल्लीन होऊन हे गाणे ऐकते आहे...

गीत संपले...आईने डोळ्यातला अश्रू हळूच पुसलेला सेमलने पाहिला..पण लगेच प्रतिक्रिया देण्याचा तिचा स्वभाव नव्हता...मनात ठेवले तिने..दोन्ही...ते गीत आणि तो अश्रूही..

तीन चार दिवसांनी सेमलने कॉलेजच्या मैत्रिणींना सहज हे सांगितले...

"
अगं..ह्या गीताची ध्वनिमुद्रिका आहे आमच्याकडे...बाबा आणि आई ऐकतात ही जुनी गाणी कधी कधी.." मैत्रीण कुसुम म्हणाली..

झालं..मोबाइल वर कॉपी करायला कितीसा वेळ...!!!

संध्याकाळी आई एकटीच गच्चीवर पाहून सेमल हळूच तिच्या मागे गेली आणि हलके तिने ते गाणे सुरु केले...

अगं.आई शिवरंजनी रागातले हे गाणे इतके करुण आहे की तुझ्याच काय...माझ्याही डोळ्यांना आज पाणी आले..
गाणे चालू होते...

"
तुझ्याच आई अश्रूसंगे, पुसले पहिले नांव...वळणावरुनी वळली गाडी..आज सोडलं गांव ..."

स्नेहल-सेमल मायलेकी एकमेकींकडे साश्रू नयनांनी बघत होत्या..

"
पण आई, त्या दिवशी तू हे ब-याच दिवसांनी ऐकलेस का भावगीत?...कारण अशी भाववश मी तुला पहिल्यांदा पाहिले"..सेमल

"
खूप खूप वर्षे झाली सेमल त्याला..." आई सांगू लागली...
....
मी लहान होते सहा वर्षाची. आम्ही सागर किना-यावर नेहेमी जात असू..जवळच होता..वाळूत खूप खेळायचो..

एकदा, माझ्या कानावर ह्याच गाण्याचे मंजुळ स्वर आले..एक म्हातारा माणूस ते वाजवत होता...ते वाद्य सारंगी होते हे मला नंतर कळले..

इतके सुरेल असे ते सूर...मला त्या लहान वयातही खूप भावले..तो शिवरंजनी हा अत्यंत करुण राग होता हेही मला खूप वर्षांनंतर समजले...

मी गेले त्या म्हाता-याजवळ..

त्याचा कातर आवाज मनाला भिडला...तो जणू बरळत होता...त्याचे डोळे दूर समुद्रावर लागले होते 
म्हणाला

"
ये ताई आलीस...किती वाट पाहिली मी तुझी. मला माहित होतं ह्या वाळूत तू पुन: माझ्याशी खेळायला येशील नक्की...

तुझ्या लग्नात हे गीत लागले होते...आपल्याला आई नव्हती..म्हणून माझ्या...तुझ्या धाकट्या भावाच्या अश्रूंनी तू पहिले नांव पुसलेस आणि वळणावरून वळलेल्या गाडीने सासरी गेलीस...
मग काही महिन्यांनी विलायतेला गेलीस...ती आलीच नाहीस..

बघ आता आलीस ना..."

इतके म्हणून त्या म्हाता-याने माझ्या रोखाने पाहिले..हात पुढे केला...पण मी खूप घाबरले आणि पळाले तिथून..

काही दिवसांनी कळले की त्याच रात्री तो म्हातारा ह्या जगातून निघून गेला होता...

मला खूप वाईट वाटले...

माझ्या लग्नात मला "गाणे म्हण असे जेव्हा कुणी सांगितले तेव्हा हेच गाणे मी म्हटले होते...

सेमल डोळे विस्फारून हे ऐकत होती...मग म्हणाली...

"
आई माझ्याही लग्नात तू हेच गाणे म्हणशील...मी नाही रडणार...आणि तू पण रडायचे नाहीस"

स्नेहल उत्तरली..

"
नाही गं बेटा...आम्ही तुझं नांवच बदलू देणार नाही...मग ते पुसायचा प्रश्नच मिटला.."

माय-लेकी मनापासून हसल्या ख-या 
पण 
साश्रू नयनांनी.. 

मधुसूदन थत्ते
०५-०४-२०१४
(
संपूर्ण स्वतंत्र कथा)

अनोळखी मुशाफिरा...वळून पाहशील का?
======================

मी...मंगेश गोडबोले...

मी मूळचा वाईचा नाही पण प्रथम वयाच्या सोळाव्या वर्षी वाईला आठ दिवस जे राहिलो तेव्हा पासून कृष्णेचे काही विलक्षण आकर्षण आणि नाते माझ्याशी जे जोडले गेले ते जन्म-जन्मांतरीचे..
आज वयाची साठी आली तरी दर दोन-तीन वर्षा आड जमेल तसे मी कृष्णाकाठी जाऊन येतो.

मला तशी गायनाची खूप आवड. गदिमांचे संथ वाहते कृष्णामाई प्रथम ऐकले ते मनात इथे घेऊन आलो..माईला म्हणून दाखवले..तीच माझी वाईची पहिली भेट.

मी गात असताना विमल फिदीफिदी हसत होती. मला नाही ते आवडले..एक पूर्ण दिवस तिच्याशी मी अबोला धरला..मग आली..", ये ना रे..चल पुन: जायचे का काठावर?"

विमल...विमल जोशीमी रहायचो त्या माझ्या मामांच्या वाड्याच्या समोरच होतं तिचं घर. घरोबा होता दोन घरांचा. त्या आठ दिवसात खूपदा आली...आम्ही फिरायला जात असू..दोघेच... तेवढ्यात तिने माझे नामकरणही केले.."मंग्या-मंगचट".

एकदा मामी, मी, विमल आणि तिची आई असे एका मराठी सिनेमाला गेलो होतो. विमल माझ्या शेजारी बसलेली मला आवडली नव्हती..कोणी काय म्हणेल..!! ती तेराची आणि मी सोळाचा..मला मुली आवडत नसत..आणि ही किती वेळा कोपरांनी मला टोकत होती..जरा काही झालं त्या कथेत की...!!

आठ दिवस कसे गेले समजले नाही. "बराय..येतो हो ..असे विमलच्या आईला मी म्हटले तेव्हा विमलच्या डोळ्यातून एक अश्रू चमकलेला मी पाहिला...मनात म्हटले किती भाबडी पोरगी आहे ही.
त्या अश्रूत ओढ होती...आणि असहाय्यतेचे दु:ख होते..जे मला तेव्हा दिसले नव्हते... 

नंतरची तीन वर्षे माझे वाईला जाणे झाले नाही. पण जेव्हा गेलो तेव्हा विमल नव्हती. मी नाही कुणाला विचारलं बिचारलं..मामी आपण होऊन म्हणाली."तिला शिकायला पुण्याला ठेवले आहे...." 

काळ कुणासाठी थांबला आहे? आज पंचेचाळीस वर्षांनी कित्येक स्थित्यंतरं झाली आहेत..जग बदललय, मी बदललोय, मामा-मामी केव्हाच निवर्तले होते...वाईला दर दोन-तीन वर्षांनी जाण्याचा माझा नियम कधी पाळला, कधी नाही...

खूप खूप पाणी कृष्णेने वाहून नेले...खूप खूप सहन केले तिने आणि वाईनेही.. नीतिमत्ता तिच्या पाण्यात बुडवलेली तिने पाहिली. आताशा सूर्याला अर्घ्य मिळेनासे झाले. 

ह्या खेपेस मी वाईला येऊन एकच दिवस झाला होता. माधवमाझा मुलगा...ह्यावेळी माझ्यासोबत होता....नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते त्याचे. आम्ही मामाच्याच वाड्यात उतरलो होतो...माझा मामेभाऊ वाईचा नगराध्यक्ष होता आता...मोठा मान होता त्याला. 

मी आणि माधव आलो होतो तीन दिवसासाठी पण माधवला, माझ्याच प्रमाणे कृष्णाकाठ खूप प्यारा झालेला दिसला...

"
बाबा, अजून एक दिवस राहू...पुन: मी एकटाच कृष्णेवर शांत बसून येईन..आपण परवा निघू...चालेल?”

खरे मलाही अजून राहायचे होते...
-------------------------------------------------------------------------- 

आम्ही पुण्याला परत येऊन दोन-तीन महिने होऊन गेले. माधवला छान अशी नोकरी मिळाली होती, स्वारी खूष असायची...आईशी जरा जास्तच त्याची दोस्ती...दोघांचे काय गुलु गुलु चालायचे झोपाळ्यावर बसून देव जाणे.

असेच एक दिवस त्यांचे "गुलु गुलु" जरा लवकर उरकले आणि मी आत पेटीवर भजन म्हणत होतो तिथे दोघेही आले...

अरेच्च्या काहीतरी भानगड आहे बहुतेक... मी ताडले.

"
अहो, माधवला तुम्हाला काही सांगायचय..."..पत्नी वसुधा म्हणाली.
"OK ..
काय रे बेटा..."..मी 

"
बाबा, मी एक मुलगी पसंत केली आहे"...माधव..
"
अरे वा...म्हणजे आम्ही अजून सुरुवातही केली नाही अन तू तर मजल गाठलीस...सांग तरी ह्या तुझ्या खास मैत्रीणीबद्द्ल... " मी.

सुनीता पाटणकर हे तिचे नाव. सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली..आई-वडील पुण्यातच..इत्यादी माहिती बरी वाटली.

"
अरे, पण तुला कुठे भेटली?"...मी 

"
मध्ये आपण वाईला गेलो होते ना...तिथे.."

"
ओहो..आत्ता लक्षात आलं तुला तिथे एक दिवस जास्त का राहायचं होतं ते...!!!" मी 

"
तसं नाही हो...ती मामांच्या वाड्यासमोर ते जोशी रहातात ना, त्यांच्याकडे आली होती. त्या जोशी आजोबांची ती नात आहे.."..माधव... 

नंतरचा तपशील देत नाही...ते अशा प्रसंगी जसे होते अगदी तसेच आमच्या घरी झाले...आणि साखरपुड्याची तारीख ठरली.

छोटासा घरगुती कार्यक्रम आमच्याच घरी झाला. सुनीता गोड दिसत होती. खेळकर होते सारे पाटणकर मंडळ..मुख्य म्हणजे गाण्याची आवड असलेले...माझ्या दृष्टीने ह्याला शंभर मार्क.

तीन तास मजेत गेले. साखरपुडा छान पार पडला.

नंतरचे दोन-तीन महिने आमचा सा-यांचा परिचय खूप वाढला, येणे-जाणे झाले ..गाण्याचे कार्यक्रम झाले...

एके दिवशी सुनीता संध्याकाळची आली तोच माधवचा फोन आला...त्याला दोन तास उशीर होणार म्हणून. वसुधा कुठे बाहेर गेली होती.

"
काका, एक विचारू?"...सुनीता..

"
काय ग बेटा..विचार ना..." मी

"
काका, तुमचे ते गाणे..'कधीतरी, कुठेतरी, फिरून भेटशील का' मला खूप आवडले..मला त्याचे रेकोर्डिंग टेप करून हवंय...कुठे मिळेल ते गाणे?"..सुनिता

"
अगं ते एका जुन्या सिनेमातले आहे..'गळ्याची शपथ' ह्या. आता कुठे असे इतके जुने गाणे मिळणार? हवे तर मी म्हणतो आणि घे तू रेकोर्ड करून माझे मोडके तोडके गाणे..." मी
"
असं नाही हो काका, तुम्ही छानच म्हणता..." तो संवाद तिथेच संपला. 

सुनीताच्या बाबांची फिरतीची नोकरी होती. नुकतेच ते परदेश दो-यावर गेले होते. माधव-सुनीता विवाह अजून सहा महिन्यांनी करायचा हे ठरले होते. सुनीताचं येणं जाणं अगदी घरच्यासारखं झालं होतं...माझ्याशी, वसुधाशी अगदी मनमोकळ्या गपा करायची ती. असेच एकदा वसुधाला तिच्या माहेरी एका कार्याला आठ दिवस जायचे होते त्या काळातली गोष्ट...

"
काका, ते गाणे, जे मला हवंय, ते तुम्ही केव्हा ऐकलत प्रथम?...." सुनीता

मला हे कळेना ह्या गाण्याचा ह्या पोरीने एवढा का ध्यास घेतला आहे...मग अगदी सारा तपशील तिला सांगितला...तो सिनेमा कोणी कोणी आम्ही पाहिला, मग हे गाणे कसे ओठावर कायम राहिले..मग त्यात मामी आली, विमलची आई आली, विमल आली...अगदी, मी पुण्याला परतताना विमलच्या डोळ्यातला अश्रूही आला...

"
काका, किती भाबडी असावी ना ही विमल.." सुनिता... 

दुस-या दिवशी माधव-सुनीता संध्याकाळी फिरून आले आणि सुनीता म्हणाली,

"
काका, उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहेआम्ही दोघांनी ठरवलय हॉटेल प्राईड मध्ये साजरा करायचा...तुम्ही तिथे पोहोचा...मी आणि माधव आईला घेऊन येतो..." 

माझ्या हो-नाही ला महत्वच नव्हते..कार्यक्रम ठरला होता..

मी हॉटेल मधे पोहोचलो तेव्हा, खास अशा एका स्वतंत्र आणि सुशोभित जागी ही तिघेही जमली होती...

"
नमस्कार, सुनीताच्या आई...जीवेत शरद: शतम..." मी

"
अहो पहा ना हिने फारच आग्रह केला...हे काय आता वय आहे का वाढदिवस असे साजरे करायल..." आई

जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या..इतक्यात सुनीताने वेटरला काही खूण केली...आणि...
मला आश्चर्याचा धक्काच बसला...ते गाणे सुनीताने कुठून तरी टेप करून मिळवले होते आणि त्या मंद प्रकाशात, त्या सजावटीच्या शांततेत लता मंगेशकरांच्या आवाजातले ते गाणे मी ऐकत होतो...

"
कधी तरी, कुठे तरी फिरून भेटशील का?..अनोळखी मुशाफरा, वळून पाहशील का..." 

"
सुनीता...अगं हे गाणं..इतके जुनेतुला मिळाले तरी कसे.." सुनीताची आई विचारती झाली.

मिळाले कुठे तरी...तू ते गुणगुणायचीस हे मी लहानपणापासून ऐकत आले आहे... सुनिता 
"
अगं हो सुनिता हे माझ्या......" 

तिला मधेच तोडून सुनीता म्हणाली...

"
आई, मला क्षमा कर पण मी तुझी डायरी चोरून एकदा वाचली होती....आई,...नव्हे, विमल,.. त्या वेळच्या तुझ्या डोळ्यातल्या लटकत्या अश्रू ची आठवण अजून ताजी असणारा हा बघ तुझा मंग्या...मंगेशा..."

विमल माझाकडे पहात असताना तिच्या डोळ्यातले भाव माझ्या वर्णनापलीकडे होते………

ह्यावेळी अश्रू मात्र तिच्या दोन्ही डोळ्यात होते... एका डोळ्यातला अश्रू तोच पंचेचाळीस वर्षां पूर्वीचा, त्या अश्रूत ओढ होती...आणि असहाय्यतेचे दु:ख होते.

दुस-या डोळ्यातला अश्रू आजचा ताजा होता...आनंदाश्रू? मी नाही सांगू शकत...

माझे अश्रू मी बाहेर येऊ दिले नाहीत... 

मधुसूदन थत्ते
२२-०९-२०१२

मित्रानो. ही माझी कथा आत्ताच लिहून हातावेगळी केली आहे. इथे post करतोय ..आपल्याला काही दोष किंवा न्यून वाटले तर जरूर सांगावे...
-------------------------------------------------------------------

मी...मंगेश गोडबोले...

मी मूळचा वाईचा नाही पण प्रथम वयाच्या सोळाव्या वर्षी वाईला आठ दिवस जे राहिलो तेव्हा पासून कृष्णेचे काही विलक्षण आकर्षण आणि नाते माझ्याशी जे जोडले गेले ते जन्म-जन्मांतरीचे..
आज वयाची साठी आली तरी दर दोन-तीन वर्षा आड जमेल तसे मी कृष्णाकाठी जाऊन येतो.
मला तशी गायनाची खूप आवड. गदिमांचे संथ वाहते कृष्णामाई प्रथम ऐकले ते मनात इथे घेऊन आलो..माईला म्हणून दाखवले..तीच माझी वाईची पहिली भेट.

मी गात असताना विमल फिदीफिदी हसत होती. मला नाही ते आवडले..एक पूर्ण दिवस तिच्याशी मी अबोला धरला..मग आली.."ए, ये ना रे..चल पुन: जायचे का काठावर?"

विमल...विमल जोशी… मी रहायचो त्या माझ्या मामांच्या वाड्याच्या समोरच होतं तिचं घर. घरोबा होता दोन घरांचा. त्या आठ दिवसात खूपदा आली...आम्ही फिरायला जात असू..दोघेच... तेवढ्यात तिने माझे नामकरणही केले.."मंग्या-मंगचट".

एकदा मामी, मी, विमल आणि तिची आई असे एका मराठी सिनेमाला गेलो होतो. विमल माझ्या शेजारी बसलेली मला आवडली नव्हती..कोणी काय म्हणेल..!! ती तेराची आणि मी सोळाचा..मला मुली आवडत नसत..आणि ही किती वेळा कोपरांनी मला टोकत होती..जरा काही झालं त्या कथेत की...!!

आठ दिवस कसे गेले समजले नाही. "बराय..येतो हो ..असे विमलच्या आईला मी म्हटले तेव्हा विमलच्या डोळ्यातून एक अश्रू चमकलेला मी पाहिला...मनात म्हटले किती भाबडी पोरगी आहे ही.

त्या अश्रूत ओढ होती...आणि असहाय्यतेचे दु:ख होते..जे मला तेव्हा दिसले नव्हते...
---------------------------------------------------------------------------------

नंतरची तीन वर्षे माझे वाईला जाणे झाले नाही. पण जेव्हा गेलो तेव्हा विमल नव्हती. मी नाही कुणाला विचारलं बिचारलं..मामी आपण होऊन म्हणाली."तिला शिकायला पुण्याला ठेवले आहे...."

काळ कुणासाठी थांबला आहे? आज पंचेचाळीस वर्षांनी कित्येक स्थित्यंतरं झाली आहेत..जग बदललय, मी बदललोय, मामा-मामी केव्हाच निवर्तले होते...वाईला दर दोन-तीन वर्षांनी जाण्याचा माझा नियम कधी पाळला, कधी नाही...

खूप खूप पाणी कृष्णेने वाहून नेले...खूप खूप सहन केले तिने आणि वाईनेही.. नीतिमत्ता तिच्या पाण्यात बुडवलेली तिने पाहिली. आताशा सूर्याला अर्घ्य मिळेनासे झाले.

ह्या खेपेस मी वाईला येऊन एकच दिवस झाला होता. माधव…माझा मुलगा...ह्यावेळी माझ्यासोबत होता....नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते त्याचे. आम्ही मामाच्याच वाड्यात उतरलो होतो...माझा मामेभाऊ वाईचा नगराध्यक्ष होता आता...मोठा मान होता त्याला.

मी आणि माधव आलो होतो तीन दिवसासाठी पण माधवला, माझ्याच प्रमाणे कृष्णाकाठ खूप प्यारा झालेला दिसला...

"
बाबा, अजून एक दिवस राहू...पुन: मी एकटाच कृष्णेवर शांत बसून येईन..आपण परवा निघू...चालेल?”

खरे मलाही अजून राहायचे होते...
--------------------------------------------------------------------------

आम्ही पुण्याला परत येऊन दोन-तीन महिने होऊन गेले. माधवला छान अशी नोकरी मिळाली होती, स्वारी खूष असायची...आईशी जरा जास्तच त्याची दोस्ती...दोघांचे काय गुलु गुलु चालायचे झोपाळ्यावर बसून देव जाणे.

असेच एक दिवस त्यांचे "गुलु गुलु" जरा लवकर उरकले आणि मी आत पेटीवर भजन म्हणत होतो तिथे दोघेही आले...

अरेच्च्या काहीतरी भानगड आहे बहुतेक... मी ताडले.

"
अहो, माधवला तुम्हाला काही सांगायचय..."..पत्नी वसुधा म्हणाली.

"OK ..
काय रे बेटा..."..मी

"
बाबा, मी एक मुलगी पसंत केली आहे"...माधव..

"
अरे वा...म्हणजे आम्ही अजून सुरुवातही केली नाही अन तू तर मजल गाठलीस...सांग तरी ह्या तुझ्या खास मैत्रीणीबद्द्ल... " मी.

सुनीता पाटणकर हे तिचे नाव. सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली..आई-वडील पुण्यातच..इत्यादी माहिती बरी वाटली.

"
अरे, पण तुला कुठे भेटली?"...मी

"
मध्ये आपण वाईला गेलो होते ना...तिथे.."

"
ओहो..आत्ता लक्षात आलं तुला तिथे एक दिवस जास्त का राहायचं होतं ते...!!!" मी

"
तसं नाही हो...ती मामांच्या वाड्यासमोर ते जोशी रहातात ना, त्यांच्याकडे आली होती. त्या जोशी आजोबांची ती नात आहे.."..माधव...

नंतरचा तपशील देत नाही...ते अशा प्रसंगी जसे होते अगदी तसेच आमच्या घरी झाले...आणि साखरपुड्याची तारीख ठरली.

छोटासा घरगुती कार्यक्रम आमच्याच घरी झाला. सुनीता गोड दिसत होती. खेळकर होते सारे पाटणकर मंडळ..मुख्य म्हणजे गाण्याची आवड असलेले...माझ्या दृष्टीने ह्याला शंभर मार्क.
तीन तास मजेत गेले. साखरपुडा छान पार पडला.

नंतरचे दोन-तीन महिने आमचा सा-यांचा परिचय खूप वाढला, येणे-जाणे झाले ..गाण्याचे कार्यक्रम झाले...

एके दिवशी सुनीता संध्याकाळची आली तोच माधवचा फोन आला...त्याला दोन तास उशीर होणार म्हणून. वसुधा कुठे बाहेर गेली होती.

"
काका, एक विचारू?"...सुनीता..

"
काय ग बेटा..विचार ना..." मी

"
काका, तुमचे ते गाणे..'कधीतरी, कुठेतरी, फिरून भेटशील का' मला खूप आवडले..मला त्याचे रेकोर्डिंग टेप करून हवंय...कुठे मिळेल ते गाणे?"..सुनिता

"
अगं ते एका जुन्या सिनेमातले आहे..'गळ्याची शपथ' ह्या. आता कुठे असे इतके जुने गाणे मिळणार? हवे तर मी म्हणतो आणि घे तू रेकोर्ड करून माझे मोडके तोडके गाणे..." मी

"
असं नाही हो काका, तुम्ही छानच म्हणता..." तो संवाद तिथेच संपला.

सुनीताच्या बाबांची फिरतीची नोकरी होती. नुकतेच ते परदेश दो-यावर गेले होते. माधव-सुनीता विवाह अजून सहा महिन्यांनी करायचा हे ठरले होते. सुनीताचं येणं जाणं अगदी घरच्यासारखं झालं होतं...माझ्याशी, वसुधाशी अगदी मनमोकळ्या गपा करायची ती. असेच एकदा वसुधाला तिच्या माहेरी एका कार्याला आठ दिवस जायचे होते त्या काळातली गोष्ट...

"
काका, ते गाणे, जे मला हवंय, ते तुम्ही केव्हा ऐकलत प्रथम?...." सुनीता

मला हे कळेना ह्या गाण्याचा ह्या पोरीने एवढा का ध्यास घेतला आहे...मग अगदी सारा तपशील तिला सांगितला...तो सिनेमा कोणी कोणी आम्ही पाहिला, मग हे गाणे कसे ओठावर कायम राहिले..मग त्यात मामी आली, विमलची आई आली, विमल आली...अगदी, मी पुण्याला परतताना विमलच्या डोळ्यातला अश्रूही आला...

"
काका, किती भाबडी असावी ना ही विमल.." सुनिता...

दुस-या दिवशी माधव-सुनीता संध्याकाळी फिरून आले आणि सुनीता म्हणाली,

"
काका, उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहे,,,आम्ही दोघांनी ठरवलय हॉटेल प्राईड मध्ये साजरा करायचा...तुम्ही तिथे पोहोचा...मी आणि माधव आईला घेऊन येतो..."

माझ्या हो-नाही ला महत्वच नव्हते..कार्यक्रम ठरला होता..

मी हॉटेल मधे पोहोचलो तेव्हा, खास अशा एका स्वतंत्र आणि सुशोभित जागी ही तिघेही जमली होती...

"
नमस्कार, सुनीताच्या आई...जीवेत शरद: शतम..." मी

"
अहो पहा ना हिने फारच आग्रह केला...हे काय आता वय आहे का वाढदिवस असे साजरे करायला..." आई

जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या..इतक्यात सुनीताने वेटरला काही खूण केली...आणि...

मला आश्चर्याचा धक्काच बसला...ते गाणे सुनीताने कुठून तरी टेप करून मिळवले होते आणि ते त्या मंद प्रकाशात, त्या सजावटीच्या शांततेत लता मंगेशकरांच्या आवाजातले ते गाणे मी ऐकत होतो...

"
कधी तरी, कुठे तरी फिरून भेटशील का?..अनोळखी मुशाफरा, वळून पाहशील का..."

"
सुनीता...अगं हे गाणं..इतके जुने,,,तुला मिळाले तरी कसे.." सुनीताची आई विचारती झाली

मिळाले कुठे तरी...तू ते गुणगुणायचीस हे मी लहानपणापासून ऐकत आले आहे.”.. सुनिता

"
अगं हो सुनिता हे माझ्या......"

तिला मधेच तोडून सुनीता म्हणाली...

"
आई, मला क्षमा कर पण मी तुझी डायरी चोरून एकदा वाचली होती....आई,...नव्हे, विमल,.. त्या वेळच्या तुझ्या डोळ्यातल्या लटकत्या अश्रू ची आठवण अजून ताजी असणारा हा बघ तुझा मंग्या...मंगेशा..."

विमल माझाकडे पहात असताना तिच्या डोळ्यातले भाव माझ्या वर्णनापलीकडे होते………

ह्यावेळी अश्रू मात्र तिच्या दोन्ही डोळ्यात होते... एका डोळ्यातला अश्रू तोच पंचेचाळीस वर्षांपुर्वीचा, त्या अश्रूत ओढ होती...आणि असहाय्यतेचे दु:ख होते
दुस-या डोळ्यातला अश्रू आजचा ताजा होता...आनंदाश्रू? मी नाही सांगू शकत...

माझे अश्रू मी बाहेर येऊ दिले नाहीत...

मधुसूदन थत्ते
२२-०९-२०१२

 — with Devidas Peshave and 12 others.