Friday, June 26, 2015

हिरवी संध्याकाळ...जणू खचून भरलेत पाचू..

मी आणि असेच एक दोघे उरलो होतो ह्या गिरीमाथ्यावर...सूर्यही नव्हता..कसा असणार श्रावणी सांजेला..?

थंड हवेची एक लहर म्हणाली…"उठ ही माझी जागा वावरायची"

उत्तरादाखल मी आय पॅड लावला..

कुमारांचा सोहोनी.."रंग ना डारो शामजी..."

हवेची लहर मग त्या ताना घेऊन दूर पळाली..

मुलायम तलम अशी तानेची हलकी फेक...जशी सागर किना-याला लाजत लाजत येणारी जललहर... जाताना तळव्याना गुदगुल्या करणारी...

कुमारांची तान गेली मनाला गुदगुल्या करून ...मधेच कुमारांनी अशी काही मध्य षड्जावरून वरच्या सप्तकात झेप घेतली...

जणू गरुड झेप...

ते ऐकून गगनातला खरा गरुड सुद्धा असा झपाट्याने एकदम वर गेला.

"तुला रे काय ज्ञान ह्या स्वर्गीय गायनाचे"..मी त्याला हटकले..

"ची ची ची..." गरुड उत्तरला
"ठाऊक कसले...तानेच्या ह्या लहरी अशा काही आल्या वातावरणात की मलाच वाटले द्यावे कुमारांना उत्तर एक सुरेख आभाळात झेप घेऊन"

गाणे संपले होते...गगनाने गुलाल उधळावा तसा अंधार उधळला...

आता मी एकटाच होतो...

नाहीतरी एकटाच आलो--एकटाच जायला हवे नाही का...???

मधुसूदन थत्ते
15-05-2015

No comments: