Sunday, November 29, 2015

अखेर ती एक छोटी कन्या होती, आई-बाबांची लाडली होती...हो, कधीकाळी...
जेव्हा ती "वसु-बेटा" होती...
"वसु-बेटा"ची वसुधा झाल्यावर आता खूप पावसाळे मागे गेले...अगदी खूप...
आज तीच वसुधा मला म्हणाली..
"काका, एका सुश्राव्य भावगीताचा आई मला अर्थ सांगायची...खूप लहान होते मी तेव्हा...पण अर्थ मनी खोल जाऊन बसला...कदाचित त्या गीतात आईच्या मनीचा "भाव" दडला होता का?...कुणी सांगावे...कित्ती वर्षे झाली त्याला...पण ते भावगीत अजून तसेच ताजे आहे...अनंत काळ ताजेच असणार आहे..."
"कुठचे गं हे भावगीत जे आज तुझ्याही मनात खोल खोल आहे...??'..मी विचारले...
"काका, त्या गीताचा राग संध्याकाळचा आहे...म्हणून संध्याकाळ झाली की अनेकदा मी ते ऐकते आणि डोळे पाणावतात..."...ती शून्यात बघत म्हणाली...
पुढे म्हणाली
"वर वर ते गाणे ऐकले तर लक्षात येत नाही की त्यात आईने शोधलेला भाव असावा...किती दशके झाली आई जाऊन...असती तर आजच्या ह्या वसुधाने तिला विचारले असते...'आई, सांग तू काय काय अनुभवलेस ते'..."
"हो पण ते गीत...?" मी अधीर होऊन विचारले..
वसुधा म्हणाली..."गीतातली ती स्त्री म्हणते...हे माझ्या जिवलगा...माझ्या परमेशा, ..ते माझे लाडले विश्व दूर, दूर राहिले ..माथ्यावरचे ओझे आता जड जड झाले बघ..आयुष्याची ही वाटचाल करून पाऊल थकले रे ..सुख-दु:खाची माया सरली...गेली...गेली...फक्त पाचोळा उरला रे आता...मी तर निराधार झाले रे...कधी मला हृदयाशी घेशील आता...??"
"बस..बस...समजले मला ते गीत.." मी तिच्या डोळ्यात पाहून बोलून गेलो..
मित्रांनो, तुम्हाला तर ते गीत लग्गेच आठवले असे नाही का?
हे घ्या...ऐका..
मधुसूदन थत्ते
२९-११-२०१५

No comments: